# ९ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना बोनस न मिळाल्यास ११ सप्टेंबरला भव्य मोर्चा!
आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा; “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका” – मिथुन मेश्राम
गोंदिया : खरीप हंगाम संपून नवीन खरीप हंगामाला सुरुवात झाली, तरी मागील हंगामातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, **९ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम जमा न झाल्यास ११ सप्टेंबर रोजी आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात गोंदियात भव्य मोर्चा काढण्यात येईल**, असा आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे जिल्हा कार्याध्यक्ष **मिथुन मेश्राम** यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामात शासनाच्या हमीभावाच्या धोरणावर विश्वास ठेवून आपला धान शासनाला विकला. हंगाम संपला, नवीन खरीप हंगाम सुरू झाला; मात्र शासनाने जाहीर केलेल्या बोनसच्या प्रतीक्षेत शेतकरी अजूनही आहेत. त्यामुळे **“शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशासाठी त्यांना वारंवार शासनाच्या दारात का उभे राहावे लागत आहे?”** असा संतप्त सवाल मेश्राम यांनी उपस्थित केला.
निवडणुकीपूर्वी आश्वासने, निवडणुकीनंतर शेतकऱ्यांचा विसर!
शेतकऱ्यांच्या नावावर मोठमोठी आश्वासने देऊन मतांची मागणी केली जाते. मात्र निवडणूक संपल्यानंतर त्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असा गंभीर आरोप मेश्राम यांनी केला.
**“शेतकऱ्यांना मतांसाठी आश्वासनांची खैरात वाटायची आणि सत्ता मिळाल्यानंतर त्याच आश्वासनांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करायची, हा प्रकार आता शेतकरी सहन करणार नाही. स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे नेते आज शेतकऱ्यांचा बोनस मिळावा म्हणून ठोस भूमिका घेताना कुठेच दिसत नाहीत,”** अशी टीका त्यांनी केली.
“गेंड्याच्या कातडीचे सरकार शेतकऱ्यांच्या वेदना ऐकत नाही”
“शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने गेंड्याच्या कातडीचे धोरण स्वीकारले आहे. शेतकरी संकटात असताना सरकार मात्र घोषणांमध्ये व्यस्त आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी तारीख-पाठोपाठ तारीख देण्यापेक्षा प्रत्यक्ष रक्कम देणे गरजेचे आहे,”** असा घणाघाती हल्ला मेश्राम यांनी केला.
शेतकऱ्याला बोनस म्हणजे कोणतीही भीक नसून, त्याच्या शेतीच्या उत्पादनाशी आणि शासनाने केलेल्या घोषणेशी संबंधित **हक्काची रक्कम** आहे. त्यामुळे बोनस देण्यास विलंब करून शासनाने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
९ सप्टेंबरची अंतिम मुदत
शासनाने **९ सप्टेंबरपर्यंत बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी**, अशी मागणी मिथुन मेश्राम यांनी केली आहे. या मुदतीपर्यंत बोनस न मिळाल्यास आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली असून, **११ सप्टेंबर रोजी आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
### शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता निर्णायक लढा
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळणे, धानाला योग्य भाव मिळणे आणि शेतीमालाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना न्याय मिळणे, या मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
**“९ सप्टेंबरपर्यंत बोनस मिळाला तर ठीक; अन्यथा ११ सप्टेंबरला शेतकऱ्यांचा आवाज गोंदियाच्या रस्त्यावर दिसेल. हा मोर्चा केवळ एका पक्षाचा नसून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचा असेल. शासनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये,”** असा इशारा मिथुन मेश्राम यांनी दिला.
शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करून बोनसची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा उद्रेकाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असेही मेश्राम यांनी स्पष्ट केले.

