गडचिरोलीत सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा बळी; तरीही आश्रमशाळा प्रशासनाला धडा नाही? सडक अर्जुनीतील आश्रमशाळेत १५ ऑगस्टच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून कामे करून घेतल्याचा आरोप; समाजकल्याण विभागाने तातडीने कारवाई करावी!

शिक्षा

गडचिरोलीत सर्पदंशाने ३ विद्यार्थिनींचा बळी; तरीही आश्रमशाळा प्रशासनाला धडा नाही?

सडक अर्जुनीतील आश्रमशाळेत १५ ऑगस्टच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून कामे करून घेतल्याचा आरोप; समाजकल्याण विभागाने तातडीने कारवाई करावी!

सडक अर्जुनी : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता सडक अर्जुनी तालुक्यातील अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून १५ ऑगस्टच्या दिवशी कामे करून घेतल्याचे छायाचित्र समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे. गडचिरोलीच्या घटनेनंतर शासनाने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

एकीकडे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून कामे करून घेण्याचा प्रकार नेमका कोणाच्या आदेशाने सुरू आहे? असा थेट सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

१५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रध्वज, पुस्तके आणि देशभक्तीचा संदेश असायला हवा; मात्र विद्यार्थ्यांकडून कामे करून घेतली जात असल्याचे छायाचित्र समोर येणे ही बाब गंभीर आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी आहेत की कामे करण्यासाठी? हा प्रश्न आता प्रशासनाला उत्तर द्यावाच लागणार आहे.

गडचिरोलीच्या घटनेनंतरही प्रशासन झोपेत?

गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेनंतर आश्रमशाळांमधील सुरक्षिततेवर शासनाने लक्ष केंद्रित केले असून नवीन सुरक्षा कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे.

मग सडक अर्जुनीतील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून कामे करून घेतली जात असल्याचे छायाचित्र समोर आल्यानंतर समाजकल्याण विभाग तातडीने जागा होणार की पुन्हा कागदी कारवाई करून प्रकरण थंडबस्त्यात टाकणार?

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सहन केला जाणार नाही!

विद्यार्थ्यांकडून नेमके कोणते काम करून घेतले? हे काम कोणी सांगितले? संबंधित कर्मचारी व अधिकारी कुठे होते? विद्यार्थ्यांकडून काम करून घेण्यास कोणाची परवानगी होती? याची तातडीने प्रत्यक्ष चौकशी करणे आवश्यक आहे.

समाजकल्याण विभागाने संबंधित आश्रमशाळेत चौकशी पथक पाठवून विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे जबाब नोंदवावेत तसेच उपलब्ध फोटो-व्हिडिओंची सत्यता तपासावी. दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

गडचिरोलीसारखी घटना पुन्हा घडण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न असल्याने आता केवळ आश्वासने नकोत; तातडीची कारवाई हवी!

फोटो समोर आला आहे; आता कारवाई कधी?

समाजकल्याण विभागाने तातडीने चौकशी करावी!

विद्यार्थ्यांकडून कामे करून घेणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी!

दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी!

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके असायला हवीत—कामाची साधने नव्हे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *